‘नीट’चा निकाल घसरला   

कट-ऑफही खाली येणार

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या नीट २०२५ परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यंदा विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घसरण झाली आहे. यामुळे शासकीयच नव्हे तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ‘एमबीबीएस’ प्रवेशासाठीचा कट-ऑफ देखील मोठ्या प्रमाणात घसरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 
यंदा भौतिकशास्त्रचा पेपर अवघड गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अपेक्षेपेक्षा कमी गुण पडले. २०२४ मध्ये नीटसाठी २४ लाख ६ हजार ७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर यंदा ही संख्या घटून २२ लाख ७६ हजार ६९ इतकी झाली. यामध्ये ९ लाख ६५ हजार ९९६ विद्यार्थी व १२ लाख ७१ हजार ८९६ विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यापैकी एकूण १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. त्यामध्ये ५ लाख १४ हजार ६३ विद्यार्थी आणि ७ लाख २२ हजार ४६२ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
 
महाराष्ट्रातून यंदा २ लाख ४८ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नीटसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मागील वर्षी ही संख्या २ लाख ८२ हजार ५१ इतकी होती, तर पात्र ठरलेल्यांची संख्या १ लाख ४२ हजार ८२९ होती.या वर्षी ६५१ ते ६८६ गुणांदरम्यान गुण मिळवणारे केवळ ७३ विद्यार्थी आहेत, तर ६०१ ते ६५० गुण मिळवणारे विद्यार्थी १,२५९ इतके आहेत. ५५१ ते ६०० गुण मिळवणार्‍यांची संख्या १०,६५८ आहे. ५०२ पेक्षा अधिक गुण मिळवणार्‍यांची रँक ५०,००० पर्यंत आहे.
 
नीट परीक्षेतील यंदाच्या कामगिरीवर भाष्य करताना आयआयटीपीकेचे संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, यंदा एमबीबीएस प्रवेशाचा कट-ऑफ सुमारे १३५ ते १५० गुणांनी घसरणार आहे. २०२४ मध्ये ६५० पेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ३०,२०० होती. मात्र, यंदा केवळ ७३ विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तसेच यंदा फक्त ५१ हजार विद्यार्थ्यांना ५०० पेक्षा अधिक गुण मिळाले असून, मागील वर्षी ही संख्या २ लाख ९ हजार होती.
 
डीपरचे संस्थापक संचालक हरीश बुटले यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतीला एमबीबीएस प्रवेशासाठी यंदा कट-ऑफ ४९५ ते ५०५ दरम्यान राहू शकतो, तर खासगी महाविद्यालयांचा कट-ऑफ ४५० ते ४९० दरम्यान जाऊ शकतो. याशिवाय, मागील वर्षी नॅशनल लेव्हल कट-ऑफ ६३६ होता, जो यंदा ५१० पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

Related Articles